सरन्यायाधीशांनी स्वतःची अन् त्यांच्या खुर्चीची इभ्रत, गरिमा राखली पाहिजे; प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्वतःची आणि त्यांच्या खुर्चीची इभ्रत व गरिमा राखली पाहिजे. असा सल्ला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी चीफ जस्टीस भूषण गवई यांना दिला आहे.
धाराशिव : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी स्वतःची आणि त्यांच्या खुर्चीची इभ्रत व गरिमा राखली पाहिजे. जेव्हा ते खुर्चीवर बसतात, तेव्हा ज्यांनी त्यांच्या सन्मानाकडे दुर्लक्ष केलं, अशा सेक्रेटरींना त्यांनी नोटीस बजावली पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी चीफ जस्टीस भूषण गवई यांना दिला आहे. प्रकाश आंबेडकर हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी देशाचे चीफ जस्टीस भूषण गवई यांच्याबाबत नाराजीच्या चर्चेवर भाष्य केलंय.
यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारने त्यांच्या दौऱ्यात मान-सन्मान केला किंवा नाही, हा मुद्दा गौण असून, “तुम्हाला लोकांनी त्या पदावर बसवलं आहे, त्यामुळे त्या पदाची प्रतिष्ठा राखणं तुमचं कर्तव्य आहे,” असं ही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी ठामपणे सांगितलं.
मान-सन्मान केला किंवा नाही, हा मुद्दा गौण- प्रकाश आंबेडकर
देशाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या भूषण गवई यांचा नुकताच मुंबईत बार कौन्सिलतर्फे सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यातून त्यांनी आपला भूतकाळ, आयुष्याचा संघर्ष आणि एकूणच त्या काळाती आठवणी जागवल्या. अमरावती जिल्ह्याच्या एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते देशाचे सरन्यायाधीश हा प्रवास उलगडताना ते यावेळी काहीशी भावूक झाले होते. तर, त्यांच्या मातोश्रींनाही अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, याच कार्यक्रमातून सरन्यायाधीशांनी राज्याच्या पोलीस प्रमुखांचे, मुख्य सचिवांचे आणि मुंबई पोलीस आयुक्तांचे कान टोचले. त्यानंतर, धावत पळत हे तिन्ही अधिकारी प्रोटोकॉलनुसार सरन्यायाधीशांच्या (CJI) स्वागताला पोहोचले होते.
दरम्यान, याच मुद्यावरून अनेक टीका आणि प्रतिक्रिया येऊ लागल्या असताना आता याच मुद्द्यावर बोट ठेवत प्रकाश आंबेडकर यांनी आपले परखड मत व्यक्त केलं आहे. सत्काराच्या कार्यक्रमांमध्ये राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळला नाही, अशी तक्रार चीफ जस्टीस गवई यांनी केली होती. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यावर आज प्रकाश आंबेडकर यांनी आपलं मत व्यक्त केल आणि खुर्चीची इभ्रत राखण्याचा सल्ला ही दिला आहे.
सरन्यायाधीशांच्या राजशिष्टाचारबाबत राज्य सरकारकडून दिशानिर्देश जारी
– भारताचे सरन्यायाधीश आता कायमस्वरुपी राज्य अतिथी म्हणून घोषित
– मुख्य सचिव अथवा त्यांचे प्रतिनिधी, पोलिस महासंचालक अथवा त्यांचे प्रतिनिधी हे मुंबईत
– राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हाधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतील.
– कोणी व्हीव्हीआयपी येत असतील तर त्यांच्या विभागाशी संबंधित संपर्कासाठी समन्वय अधिकारी नेमणे आधीच्या आदेशानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांच्या भेटीवेळी विधी व न्याय विभागाने मुंबईसाठी, तर जिल्ह्यात असेल जिल्हाधिकार्यांनी समन्वयासाठी क्लास 1 अधिकारी नेमणे बंधनकारक असेल.