भारत पाकिस्तान युद्ध थांबलं! शस्त्रसंधीसाठी दोन्ही देश तयार!
विशेष प्रतिनिधी

भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध अखेर थांबलं आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी अधिकृतपणे याची घोषणा केली आहे. आज (शनिवारी) दुपारी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधीची अंमलबजावणी होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सर्वात आधी ही माहिती दिली होती. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने अधिकृतपणे याला दुजोरा दिला.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त करत प्रत्युत्तर दिलं. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात असताना, भारताने मात्र ते परतून लावले आहेत. मात्र आता भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याला दुजोरा दिला आहे.
“अमेरिकेने मध्यस्थी केल्याने रात्रभर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कॉमन सेन्स आणि आपल्या हुशारीचा वापर केल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची पोस्ट
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनीही पोस्ट शेअर करत याला दुजोरा दिला आहे. “पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता पाकिस्तानने नेहमीच या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.